पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत!

अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर त्यासाठी माणसाच्या विचारसरणीत मूलभूत बदल आवश्यक आहे, असे प्रतिपादन पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांनी केले.
ते म्हणाले की, समाजातील अनेक समस्या या “अजनुकीय माहिती” (NGI) म्हणजेच व्यक्तीच्या मेंदूत साठलेल्या संस्कार, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि सामाजिक पॅटर्नमुळे निर्माण होतात. “कायदे बाहेरून बदलतात, पण वर्तन आतून नियंत्रित होते. त्यामुळे NGI मध्ये बदल न झाल्यास समाजात खरा बदल घडत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अॅड. गवळी यांनी सांगितले की, जातव्यवस्था, अंधश्रद्धा, स्त्रीदास्य आणि मतदारदास्य या समस्या पिढ्यान्पिढ्या टिकून राहण्यामागे चुकीची NGI कारणीभूत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी “RECONSCIO गव्हर्नन्स” या संकल्पनेवर भर दिला. जागरूकता, आत्मनियंत्रण आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांच्या आधारे व्यक्तीने निर्णय घेतल्यास समाजात संतुलन साधता येईल, असे ते म्हणाले.
मानवी भावनांमध्ये ‘Centripetal’ (स्वकेंद्रित) आणि ‘Centrifugal’ (समाजकेंद्रित) या दोन प्रकारांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. “स्वार्थ आणि समाजहित यामधील संतुलन बिघडल्यामुळेच अनेक सामाजिक ताण निर्माण होतात,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या समस्यांवर दीर्घकालीन उपाय म्हणून शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विशेषतः इयत्ता ४ ते १२ या वयोगटात वैज्ञानिक दृष्टिकोन, समता, विवेक आणि सामाजिक जबाबदारी यांचे शिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचे कार्यकर्ते प्रयत्नशील असून या संकल्पनांच्या प्रसारासाठी पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेचे कार्यकर्ते राज्यभर जनजागृती करत असून, शिक्षण, सामाजिक प्रबोधन आणि कायदेशीर मार्गदर्शनाद्वारे NGI मध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
या उपक्रमात अॅड. अमित थोरात, अॅड. लक्ष्मण पोकळे, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, प्रकाश गोसावी, प्रतीक म्हस्के, वीर बहादुर प्रजापती, पोपट भोसले, यमनाजी म्हस्के, संजय देवढे, अनिल घाटविसावे, अशोक भोसले, रमा आढाव, आनंदा आढाव, संजय शेकडे, शाहीर कान्हू सुंबे, ओम कदम, बाजीराव गव्हाणे, लखन साळवे आदी कार्यकर्ते सक्रियपणे योगदान देत आहेत.
“स्वातंत्र्याने कायदे बदलले… आता मेंदू बदलण्याची वेळ आली आहे,” असा संदेश देत अॅड. गवळी यांनी समाजपरिवर्तनासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले.











