आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील हुतात्मा स्मारक येथे कार्यकर्त्यांनी अभिवादन करून पुष्पांजली अर्पण
“जनलोक मानसशास्त्र क्रांतीचा बिगुल!”
अहिल्यानगर (प्रतिनिधी) — महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज अहिल्यानगरात समाजपरिवर्तनाच्या दिशेने मोठी घोषणा करण्यात आली. “जनलोक मानसशास्त्र क्रांती” या नव्या संकल्पनेचा शुभारंभ करत शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची मागणी करण्यात आली. पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या संयुक्त पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला.
या वेळी पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.कारभारी गवळी यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, “जातव्यवस्था, अंधश्रद्धा, दैववाद, स्त्रीदास्य आणि मतदान-दास्य या केवळ सामाजिक समस्या नसून त्या मानवी मेंदूत साठलेल्या Centripetal Non-Genetic Information (NGI) चा परिणाम आहेत. या चुकीच्या मानसिक साच्यांचे निर्मूलन शिक्षणातूनच शक्य आहे.”
कार्यक्रमात नवीन शिक्षण प्रणालीची रूपरेषा मांडण्यात आली. त्यानुसार, इयत्ता चौथी ते बारावीपर्यंत “NGI Correction” हा स्वतंत्र अभ्यासक्रम लागू करावा, विद्यार्थ्यांना “काय शिकायचे?” यासोबतच “काय विसरायचे?” हेही शिकवले जावे, तसेच मेंदूत साठलेली चुकीची माहिती ‘bury and forget mechanism’ द्वारे नष्ट करण्याची संकल्पना राबवावी, अशी मागणी करण्यात आली.“जनलोक मानसशास्त्र क्रांती” आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील हुतात्मा स्मारक येथे कार्यकर्त्यांनी अभिवादन करून पुष्पांजली अर्पण केली. समाजपरिवर्तनाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीला उजाळा देत या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
यानंतर आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात पुढे गेले. कार्यक्रमादरम्यान भोंदूगिरीविरोधात तीव्र संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी ‘भोंदू बाबा कॅप्चर खरात’ याच्यावर प्रतीकात्मक निषेध म्हणून शेणाचे लाडू फेकले. या कृतीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, मात्र पोलिसांच्या उपस्थितीत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांनी भोंदू खरातला पाठिंबा देणाऱ्या मंत्री, पुढारी आणि अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “अंधश्रद्धा पोसणाऱ्यांना थारा नाही”, “भोंदूगिरीचा नायनाट करा” अशा घोषणा विरबहादूर प्रजापती देत यांचे कडून निषेध नोंदवण्यात आला.
कार्यकर्त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या आणि भोंदू प्रवृत्तीला पाठिंबा देणाऱ्या कोणत्याही पुढाऱ्यांना स्थान नाही.
या आंदोलनामुळे शहरात सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनाच्या मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली असून, जनलोक मानसशास्त्र क्रांतीची संकल्पना अधिक व्यापक पातळीवर पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे.

या कार्यक्रमात अशोक सब्बन, प्रकाश थोरात,ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हु सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीर बहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते..
अॅड.गावळी यांनी पुढे सांगितले की, “निसर्गातच एक अशी यंत्रणा आहे जी जुनी, अनुपयोगी आणि त्रासदायक आठवणी मेंदूच्या खोल स्तरावर गाडून टाकते. हाच सिद्धांत शिक्षणात वापरल्यास मानवी ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बदलता येईल आणि समाज अधिक वैज्ञानिक व समतावादी बनेल.”
दरम्यान, आंदोलनात लक्ष वेधण्यासाठी वादग्रस्त पण प्रतीकात्मक पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला. ‘शेण लाडू’ अर्पण करून सामाजिक कुप्रथांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात चर्चा रंगली असून, शिक्षण व्यवस्थेतील बदलांविषयी नव्याने विचारमंथन सुरू झाले आहे.










