शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची दिशा म्हणजे सत्तेचा लोकाभिमुख अर्थ – जयंतीनिमित्त ॲड.कारभारी गवळी यांचे अभिवादन व जनतेला संदेश

अहिल्यानगर प्रतिनिधी/- शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अहिल्यानगर येथे साजरी करण्यात आली. यानिमित्त पीपल्स हेल्पलाइनचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.कारभारी गवळी यांनी अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करत त्यांच्या विचारांवर भाष्य केले. “लोकशाही ही केवळ मतदानाचा अधिकार नसून ती एक जीवनदृष्टी आहे. अण्णाभाऊ साठे हे त्या जीवनदृष्टीचे मूर्तिमंत उदाहरण होते,” असे गवळी यांनी स्पष्ट केले.
ॲड. गवळी म्हणाले की, अण्णाभाऊ साठेंचं साहित्य म्हणजे समाजातील शोषण, उपेक्षा आणि असमानतेच्या विरोधात उभा राहिलेला आवाज होता. त्यांच्या कथा, कविता आणि शाहिरी ही केवळ करमणूक नव्हती, ती समांतर इतिहास रचणारी आणि सामाजिक परिवर्तन घडवणारी शक्ती होती. “आज अण्णाभाऊंच्या साहित्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. त्यात केवळ भावनिक आवेश नाही, तर व्यवस्था बदलण्याची शक्ती आहे,” असे त्यांनी नमूद केले.साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांचे विचार बहुजन समाजामध्ये पोहोचवण्यासाठी यापुढे पीपल्स हेल्पलाइन चे कार्यकर्ते अशोक सब्बन,सुधीर भद्रे, मिराबाई सरोदे,बबलू खोसला, वीर बहादुर प्रजापती,भगवानराव जगताप,यमनाजी मस्के, आनंद आढाव, प्रकाश थोरात, संदीप पवार, अशोक भोसले,पोपट भोसले,ॲड. अमित थोरात शाहीर कानू सुंबे, आदि. कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
“शाहिरी ही गोष्ट सांगण्याची लोककला असली, तरी अण्णाभाऊंसाठी ती विरोध, संघटन आणि आत्मभानाची क्रांती होती,” असेही गवळी यांनी सांगितले. त्यांनी ‘Micro-CONSCIO’ म्हणजे सूक्ष्म भावनिक जाणीवेच्या आधारे केंद्राभिमुख आणि केंद्रापसारी शक्तींमध्ये समतोल साधण्याची संकल्पना मांडली. “सत्तेचा उपयोग जर केवळ काहींसाठी होत असेल, आणि उर्वरितांसाठी अन्यायजन्य ठरत असेल, तर ती लोकशाही नव्हे — ती छलशाही ठरते,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
कार्यक्रमाच्या समारोपात ॲड. गवळी यांनी जनतेला संदेश दिला की, “अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करायचं असेल, तर त्यांचे विचार कृतीत आणावेत. सत्ताकारण समाजाभिमुख व्हावं, शिक्षण मूल्याधारित असावं, आणि गरिबांच्या कथा समाजाच्या मुख्य प्रवाहात याव्यात. ‘लोकांसाठी आणि लोकांमधून जन्मलेली सत्ता’ हीच अण्णाभाऊंच्या विचारांची खरी दिशा आहे — हेच आजच्या काळात समजून घेणं आवश्यक आहे.”










