पाण्याच्या प्रत्येक थेंबात भविष्य दडलेले आहे -ॲड. कारभारी गवळी
(पीपल्स हेल्पलाईनतर्फे ॲड. गवळी यांचा संदेश)
अहिल्यानगर | प्रतिनिधी:- मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाडा ही भूमी केवळ भौगोलिक नाही, तर भावनिक आहे. कधी दुष्काळाने कोरडी तर कधी अतिवृष्टीने वाहून जाणारी ही भूमी आता जलजागृतीच्या नव्या क्रांतीसाठी सज्ज झाली आहे. पीपल्स हेल्पलाईनचे ॲड. कारभारी गवळी यांनी “रेन गेन बॅटरी ओलाशय – धनराई” या तिहेरी लोकसंकल्पातून निसर्गाभिमुख जलक्रांतीचा नवा मार्ग दाखवला आहे.
ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले की, धरणांतून तब्बल ७९६ टीएमसी पाणी पुराच्या रूपात वाहून गेले — ज्याचे आर्थिक मूल्य ₹७९,६०० कोटी इतके आहे. त्याचबरोबर जवळपास ₹१ लाख कोटींची पिकांची हानी झाली. ही केवळ आर्थिक नव्हे, तर भावनिक आणि बौद्धिक दिवाळखोरी आहे.
“रेन गेन बॅटरी” ही प्रत्येक थेंब साठविण्याची निसर्गीय प्रयोगशाळा,पाणी वाहू देऊ नका,जमिनीत झिरपू द्या! या घोषवाक्याने प्रेरित रेन गेन बॅटरी म्हणजे साध्या पण प्रभावी तंत्रज्ञानाचा नवा अध्याय आहे. फक्त ५x३x३ फूट खड्ड्यात दगड व मुरूम भरल्याने पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या भूमीत शोषले जाते. ही प्रक्रिया शेतात, शाळेत,कारखान्यात, रस्त्यांवर सहज शक्य आहे. प्रत्येक रेन गेन बॅटरी म्हणजे एक लघु जलमंदिर आहे, जिथे पाण्याचा थेंब निसर्गाशी एकरूप होतो.
ओलाशय हे पृथ्वीच्या अंतःकरणातील जलकोश असून त लाव आणि धरणांपेक्षा जमिनीखाली तयार होणारे ओलाशय अधिक जीवनदायी आहेत. रेन गेन बॅटरीच्या साहाय्याने तयार होणारे हे ओलाशय जमिनीला आतून थंडावतात, वाळवंटीकरण रोखतात आणि भूमीचा जलसाठा दीर्घकाळ टिकवतात. हेच लोकभज्ञाक चेतनेचे मूर्त रूप आहे. जिथे मानव निसर्गाशी सहजीवन करतो असे ही गवळी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच “धनराई” मुळे कोरडवाहू शेतीचा हरित पुनर्जन्म असून मराठवाड्याची कोरडवाहू शेती ही संकट नव्हे, तर संधी आहे. भूमिगत ओलाव्यावर आधारित Minimum Moisture Farming या संकल्पनेतून फळझाडे, औषधी वनस्पती व टिकाऊ पिकांचे उत्पादन शक्य आहे. ही योजना शेतकऱ्यांना उत्पन्न, पर्यावरण संतुलन आणि ग्रामीण रोजगार देऊन हे तिन्ही लाभ देते. असेही ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले.
ॲड. गवळी म्हणाले, “जलसंस्कृती” राष्ट्रभक्तीचा नवा अर्थ असून ,“जलसंस्कृती” राष्ट्रभक्तीचा नवा अर्थ आहे “सुजलाम्, सुफलाम्” हे फक्त राष्ट्रगीताचे शब्द नाहीत तर तो कृतीमंत्र आहे. प्रत्येक गावात १०-२० रेन गेन बॅटऱ्या, भूगर्भ जलनकाशाचा अभ्यास, शेतकऱ्यांसाठी जलसाक्षरता मोहिमा, नदीतील चेकडॅम्स, पर्कोलेशन टाक्या आणि जल-संकल्प पंचायत या उपक्रमांनी महाराष्ट्राचा जलदृष्टीकोनच बदलू शकतो.
ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले की “लोकभज्ञाक शासन” हे लोक, निसर्ग आणि विज्ञान यांचा त्रिवेणी संगम आहे. “आज शासनात धोरणे आहेत, पण निसर्गाचे शास्त्र हरवले आहे. लोकभज्ञाक शासन म्हणजे लोकभक्ति, ज्ञानभक्ति आणि कर्मभक्ति यांचा संगम. ही त्रिवेणी शासनात उतरली तर निसर्गपाल धर्म प्रत्यक्षात येईल.” आता कृती करण्याची वेळ आली असून ७९,६०० कोटींचा जलअपव्यय थांबवायचा असेल, तर पावसाच्या प्रत्येक थेंबाला साठवणुकीचा सन्मान दिला पाहिजे. शासन, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि तरुण या चौघांच्या एकत्र कृतीने रेन गेन बॅटरी – ओलाशय – धनराई चळवळ ही “जीवदान योजना” ठरू शकते. या करिता पीपल्स हेल्प लाईन चे कार्यकर्ते अशोक सब्बन,प्रकाश थोरात, कैलास पठारे, विरबहादूर प्रजापती, भगवान राव जगताप, संदीप पवार, प्रयत्न शील आहेत.
निसर्गासाठी दयाळूपणा नव्हे, न्याय हवा. त्याचा सन्मान, संवर्धन आणि सहजीवन हीच खरी प्रगती! मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्याच्या हिरवाईसाठी, गोदावरी खोऱ्याच्या समृद्धीसाठी आणि भारताच्या उन्नतीसाठी रेन गेन बॅटरी, ओलाशय, धनराई, सुजलाम्, सुफलाम हा मंत्र अमलात आणावा लागेल.

