
पुणे, प्रतिनिधी : आधुनिक काळात विज्ञान व तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली असली तरी समाजातील युद्धे, जातीय द्वेष, अंधश्रद्धा आणि पर्यावरणीय संकटे यांसारख्या समस्यांमुळे मानवजातीसमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या विरोधाभासामागे “अजनुकीय माहितीची गुलामगिरी” ही अदृश्य शक्ती कार्यरत असल्याचे मत पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य समाचारशी बोलताना ॲड. गवळी म्हणाले की, “महामारी” हा शब्द केवळ रूपक नसून सामाजिक आणि मानसिक पातळीवर पसरलेली ही गंभीर समस्या आहे. पिढ्यान्पिढ्या संक्रमित होणारी मानसिकता, हिंसा व संघर्षांचे मूळ आणि दीर्घकालीन परिणाम यांमुळे अजनुकीय माहितीची गुलामगिरी ही खरी सामाजिक-मानसिक महामारी ठरते. कोविडसारख्या महामारीने शरीरावर परिणाम केला, परंतु ही महामारी मनावर राज्य करते आणि त्याच माध्यमातून समाज व इतिहास घडवते.
मध्यपूर्वेतील संघर्षाचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, तो केवळ भू-राजकीय मुद्दा नसून धार्मिक ओळख, ऐतिहासिक तक्रारी आणि “आम्ही विरुद्ध ते” या विचारसरणीचा परिणाम आहे. जोपर्यंत समाजातील माहिती आणि विचारसरणी बदलत नाही, तोपर्यंत इतिहास बदलत नाही, तो केवळ नव्या स्वरूपात पुन्हा समोर येतो.
समाजातील समस्यांकडे पाहताना संतुलित दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. व्यक्ती चुकीच्या माहितीचा परिणाम असली तरी तिची नैतिक जबाबदारी कायम राहते. त्यामुळे माहितीमध्ये बदल घडवणे जितके आवश्यक आहे, तितकेच जबाबदारीची जाणीव ठेवणेही महत्त्वाचे आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी “एकात्मिक ज्ञान सिद्धान्त (IKT)” मांडला. हा सिद्धान्त कोणत्याही विश्वासाला विज्ञान, तर्क आणि न्यायाच्या कसोट्यांवर तपासतो. जातिव्यवस्था, धार्मिक अतिरेकीपणा आणि पर्यावरणविषयक चुकीच्या धारणा या या कसोट्यांवर टिकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. IKT ही सत्य शोधण्याची शिस्तबद्ध प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच “RECONSCIO गव्हर्नन्स” ही संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, IKT योग्य-अयोग्य याचा बोध करून देते, तर RECONSCIO त्या योग्यतेनुसार कृती करण्यास प्रेरित करते. विवेकाधारित निर्णय, भावनांमध्ये संतुलन आणि सजग कृती यावर आधारित ही शासनव्यवस्था असल्याचे त्यांनी नमूद केले.
या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी “जनलोक संडे स्कूल” सारख्या उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत स्थानिक स्तरावर साप्ताहिक चर्चासत्रे घेऊन अंधश्रद्धा, आरोग्य आणि पर्यावरण यांसारख्या विषयांवर वैज्ञानिक पद्धतीने चर्चा केली जाते आणि नागरिकांमध्ये विचारशीलता विकसित केली जाते.
“उपाय बहिष्कारात नसून माहितीच्या रूपांतरात आहे. बहिष्कार हे काही वेळा साधन असू शकते, पण अंतिम उद्दिष्ट नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी शेवटी आवाहन केले की, “विचार बदला — माणूस बदलेल; माणूस बदलेल — समाज बदलेल; समाज बदलेल — जग बदलेल.”
