
ज्याने स्वतःच्या मनावर शासन केले, त्यानेच खरे स्वराज्य मिळवले! – ॲड.कारभारी गवळी
अहिल्यानगर/प्रकाश थोरात:- “RECONSCIO Governance म्हणजे बाहेरची सत्ता नव्हे, तर स्वतःच्या मनावरचे शासन होय,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.कारभारी गवळी यांनी जाणीवपूर्वक शासनाची संकल्पना स्पष्ट केली.
मानवाला निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे ‘जाणीव’ (Consciousness) असून तीच माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे करते, असे ते म्हणाले. मात्र, ही जाणीव आपण खऱ्या अर्थाने वापरतो का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सांगितले की बहुतांश वेळा माणूस सवयी, परंपरा, भावना आणि अंधानुकरण यांच्या प्रभावाखाली निर्णय घेतो. हे अवचेतन मनाचे राज्य आहे. परंतु जेव्हा व्यक्ती थांबून विचार करते, सत्याची पडताळणी करते आणि दीर्घकालीन परिणामांचा विचार करून निर्णय घेते, तेव्हा तेच खरे RECONSCIO Governance ठरते.
स्वतःच्या मनावर शासन करणे हीच या संकल्पनेची सुरुवात असल्याचे सांगताना ॲड. गवळी म्हणाले की, मनात भावना, भीती, अहंकार, पूर्वग्रह आणि जुने संस्कार असे अनेक थर असतात. मनावर नियंत्रण नसल्यास निर्णय राग, द्वेष, लोभ किंवा समूहभावनेवर आधारित होतात. मात्र जाणीवपूर्वक शासन म्हणजे भावनांवर मात करणे, आत्मपरीक्षण करणे, चुका मान्य करून त्यातून शिकणे. “ज्याने स्वतःच्या मनावर शासन केले, त्यानेच खरे स्वराज्य मिळवले,” असे त्यांनी नमूद केले.
ज्ञानकेंद्रित शासनावर भर देताना त्यांनी स्पष्ट केले की समाजातील अनेक समस्या अज्ञानामुळे निर्माण होतात. अंधश्रद्धा, जातीयता, पर्यावरणाचा ऱ्हास आणि चुकीचे राजकीय निर्णय हे त्याचे परिणाम आहेत. ज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, तर सत्य तपासण्याची आणि तर्काने विचार करण्याची क्षमता होय. शिक्षणाला प्राधान्य, संशोधनाला प्रोत्साहन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे ज्ञानकेंद्रित शासनाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजहिताला सर्वोच्च स्थान देणे हे RECONSCIO Governance चे अंतिम उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करत त्यांनी म्हटले की, निर्णय जर केवळ वैयक्तिक फायद्यासाठी घेतले गेले तर भ्रष्टाचार वाढतो, विषमता वाढते आणि पर्यावरणाचे नुकसान होते. परंतु समाजहिताला प्राधान्य दिल्यास समानता, न्याय आणि लोकशाही बळकट होते.
आजच्या माहितीच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता, विज्ञान आणि तंत्रज्ञान उपलब्ध असले तरी मनावर नियंत्रण नसेल तर खोटी माहिती, भावनिक उन्माद आणि सामाजिक तणाव वाढतो. त्यामुळे आजच्या काळात RECONSCIO Governance अधिक आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
“खरा बदल व्यक्तीपासून सुरू होतो. व्यक्ती जाणीवपूर्वक वागू लागली की कुटुंब, गाव, शहर आणि शेवटी राष्ट्र बदलते,” असे सांगत ॲड. गवळी यांनी RECONSCIO Governance ही केवळ विचारधारा नसून वैयक्तिक व सामाजिक उत्क्रांतीची दिशा असल्याचे शेवटी स्पष्ट केले.
