“लोकभज्ञाक घोषणा” प्रत्येक उमेदवारासाठी बंधनकारक :पीपल्स हेल्पलाइन
अहिल्यानगर,(महाराष्ट्र राज्य समाचार) :महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पीपल्स हेल्पलाइन या जनसेवी संस्थेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संस्थेचे अध्यक्ष ॲड. कारभारी गवळी यांनी आज जाहीर केले की, आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराने “लोकभज्ञाक घोषणा” मतदारांसमोर सादर करणे आवश्यक असेल.
ही घोषणा कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेली नसून, ती “सूर्यसाक्षी लोकसेवा” या लोकाभिमुख तत्त्वावर आधारित आहे. गवळी यांनी सांगितले की, “सूर्याला साक्ष ठेवून ही घोषणा म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि लोकहिताशी असलेली बांधिलकी आहे. सत्तेचा उद्देश स्वतःचा लाभ नव्हे, तर समाजाचा विकास असावा, हा या घोषणेचा आत्मा आहे.” लोकभज्ञाक घोषणा — लोकशाहीचा नवा प्रामाणिक संकल्प या घोषणेतील प्रमुख मुद्दे असे आहेत:
१. मी कधीही लोकमकात्याप्रमाणे वागलो नाही — म्हणजेच लोकांच्या सुखदुःखाकडे, पर्यावरण आणि समाजहिताकडे मी कधीही उदासीन राहिलो नाही. माझे जीवन लोकसेवेसाठी अर्पण आहे.
२. मी कधीही टक्केवारी किंवा भ्रष्टाचारात सहभागी झालो नाही — दलाली, कमिशन, लाचखोरी वा सत्तेचा गैरवापर हे माझ्या जीवनाशी विसंगत आहेत.
३. मी सदैव लोकभज्ञाक कार्यकर्ता म्हणून कार्य केले आहे — माझ्या कार्याचा पाया लोकभक्ती (लोकांविषयी प्रेम), ज्ञानभक्ती (समग्र ज्ञानाचा अभ्यास), आणि कर्मभक्ती (निष्काम लोकसेवा) या तीन भक्तींवर उभा आहे.
४. मी माझ्या कार्याची पारदर्शक सिद्धता मतदारांसमोर देईन — सूर्याला साक्ष ठेवून, मी माझ्या जीवनातील सार्वजनिक कार्याचा पुरावा देईन.
५. जो उमेदवार जनतेपासून दूर राहतो, त्याची जामीनरक्कम जप्त व्हावी — लोकशाही म्हणजे जनतेशी संवाद साधण्याचे धैर्य, त्यांच्यासोबत जगण्याची वृत्ती. जो जनतेला टाळतो, तो लोकसेवा नव्हे तर स्वार्थसेवा करतो.
लोकभज्ञाकशाहीचे ध्येय पीपल्स हेल्पलाइनने स्पष्ट केले आहे. लोकशाही ही मतदानापुरती मर्यादित नसून, ती लोकांच्या हृदयाशी जोडलेली भावना आहे.लोकभज्ञाकशाही म्हणजे,लोकभक्तीने प्रेरित लोकशाही, ज्ञानभक्तीने प्रकाशित लोकशाही,आणिकर्मभक्तीने सिद्ध झालेली लोकशाही.हीच खरी उन्नत लोकशाही आहे — जिथे सत्तेचा उद्देश स्वतःचा लाभ नव्हे, तर समाजाचा समग्र विकास असतो. सूर्यसाक्षी लोकसेवेचा संदेश हा पीपल्स हेल्पलाइनच्या घोषणेनुसार, सूर्य जसा सर्वांना समान प्रकाश देतो, तसाच प्रत्येक लोकप्रतिनिधीने सर्व नागरिकांना समान न्याय, समान सेवा आणि समान आदर द्यावा.हीच लोकभज्ञाक घोषणेची आत्मा आणि लोकशाहीची खरी ओळख आहे.पीपल्स हेल्पलाइनचे अध्यक्ष ॲड. कारभारी गवळी यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले की,“प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचाराचा प्रारंभ ‘लोकभज्ञाक घोषणा’ वाचून करावा.ही केवळ शपथ नाही, तर महाराष्ट्राच्या लोकशाहीला नवसंजीवनी देणारा संकल्प आहे.”
जय लोकभज्ञाकशाही!जय किसान, जय निसर्गपाल!सूर्यसाक्षी लोकशाही अखंड राहो! अशी घोषणा देण्यात आली आहे.
