
गुरु पौर्णिमे निमित्त बुद्धवंदना व सन्मान सोहळा
अहिल्यानगर | प्रतिनिधी:- गुरुपौर्णिमेच्या शुभदिनाचे औचित्य साधून तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडिया व क्रांतीसूर्य बहुउद्देशीय प्रतिष्ठान, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने “आषाढ पौर्णिमा (वर्षावास प्रारंभ)” निमित्त भव्य बुद्धवंदना व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात बुद्धगया येथे प्रत्यक्ष दर्शन घेऊन आलेल्या २२ बौद्ध उपासकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बुद्ध धम्माचे विचारवंत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणून प्रख्यात असलेले प्रा.विलास खरात म्हणाले “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मी भारत बौद्धमय करीन’ ही घोषणा केवळ उद्गार म्हणून नाही, तर एका दीर्घकालीन परिवर्तनाच्या मिशनच्या स्वरूपात केली होती. त्यांच्या विचारांची ‘ब्लू प्रिंट ऑफ बुद्धिझम’ हाच त्यांच्या मिशनचा गाभा होता,” असे प्रतिपादन नामवंत विचारवंत व प्राध्यापक डॉ. विलास खरात यांनी वर्षावास, आषाढी पौर्णिमे प्रसंगी केले. ते ‘बुद्धधम्म आणि आंबेडकरी मिशन’ या विषयावर आयोजित बुद्धगया येथून आलेल्या उपासकांच्या सन्मान सोहळ्यानिमित्त विशेष व्याख्यानात बोलत होते. प्रा.खरात म्हणाले, “डॉ. आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म (धर्म) या ग्रंथातून भारतातील शोषित, वंचित आणि बहिष्कृत समाजासाठी नवजीवनाचे दार खुले केले. त्यांनी दिलेले पंचशील व अष्टांगिक मार्ग हे केवळ वैयक्तिक नैतिकता नसून सामाजिक परिवर्तनाचे ठोस सूत्र आहे. ते समाज व्यवस्थेचे पुनर्रचना करणारे तत्त्वज्ञान होते.”
“डॉ. आंबेडकरांचे बौद्ध धम्मादिक्षा प्रवेश हे केवळ धर्मांतर नव्हते, तर क्रांतिकारी सामाजिक मिशन होते. त्यामागे ‘ब्लू प्रिंट ऑफ बुद्धिझम’ होती – म्हणजे एक सामाजिक समतेवर आधारित मानव मुक्तीची क्रांती होती,”असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. प्रा. खरात यांनी पुढे सांगितले की, “आजच्या काळात डॉ. आंबेडकरांचा बौद्ध विचार नव्या पिढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तो संघर्षाचा नव्हे तर समतेचा, शांततेचा आणि विवेकवादाचा मार्ग आहे. त्यामुळे त्यांच्या ‘बुद्धमय भारत’ या संकल्पनेची जाणीव ठेवत कार्य करणे हेच आपले ध्येय असली पाहिजे.

(बौध्द धम्माचे भंतेजी यांना चिवर दान प्रसंगी प्रा.विलास खरात, बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे,आयु. संजय कांबळे, प्रा. दिलीप गायकवाड, डॉ.भास्कर रणनवरे,प्रा. कांबळे, आदी.)
यावेळी आयु. संजय कांबळे यांनी गुरु पौर्णिमेचे महत्व विशद केले.सांगितले, या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दिलीप गायकवाड, प्रा.विलास साठे, प्रा.विश्वासराव कांबळे, डॉ. भास्कर रणनवरे, किरणजी साळवे, धम्म मित्र प्रकाश थोरात, शशिकांत घोडके, रवींद्र कांबळे, बौद्ध संस्कार संघाचे भाऊसाहेब देठे, मोहन शिरसाट, प्रकाश पगारे, अशोक मोरे, एल.एम. जाधव, बापूसाहेब भिंगारदिवे, छाया शिरसाट, रमेश पगारे आदी उपस्थित होते. सन्मानित उपासकांमध्ये संतोष ढगे, संस्कृती ढगे, मंगल हंबर्डे, गौरम कदम, हेमलता कदम, कृपा कदम, भाऊसाहेब भातकुडव, जोस्ना पठारे, प्रमिला पानपाटील, सुनीलदत्त स्वामी, लक्ष्मी आल्हाट, विजय आल्हाट, अनिल आंबावडे, उज्वला आंबावडे यांचा विशेष उल्लेख करता येईल. तसेच थायलंड येथे ४० दिवस ध्यानसाधना करून परतलेल्या प्रशांत बोरुडे, संदीप वाघमारे,आणि मोहन शिरसाट यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमा चे शेवटी बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे यांनी सर्वांचे आभार मानले.
