युद्धाविरोधात ग्लोबल ब्रेन ड्रेन आंदोलन! -ॲड.कारभारी गवळी
अहिल्यानगर | प्रतिनिधी:-अहिल्यानगर येथील दिल्ली गेट परिसरात १९ मार्च २०२६ रोजी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने “ग्लोबल ब्रेन ड्रेन आंदोलन” आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड. कारभारी गवळी यांनी दिली. जगातील वाढत्या युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर मानवजातीचे अस्तित्व, शांतता आणि विवेकाधारित शासनव्यवस्थेची गरज यावर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या निमित्ताने “ग्लोबल ब्रेन गेन क्रांती २०२६ : जीवनाच्या अस्तित्वासाठी जागतिक जाहीरनामा” प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जग सध्या एका महत्त्वाच्या वळणावर उभे असून युद्ध, पर्यावरणीय संकट आणि अण्वस्त्रांचा वाढता धोका ही मानवजातीसमोरील गंभीर आव्हाने असल्याचे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
आखाती प्रदेशातील वाढत्या संघर्षामुळे निरपराध लोकांचे प्राण जात आहेत, पायाभूत सुविधा आणि संस्कृतीचा नाश होत आहे, तसेच मानवाची ज्ञानसंपत्तीही नष्ट होत आहे. युद्धामुळे केवळ जीवितहानीच होत नाही तर पिढ्यान्पिढ्या निर्माण झालेल्या वैज्ञानिक आणि बौद्धिक संपत्तीचा देखील नाश होतो, असे मत आंदोलनाच्या आयोजकांनी व्यक्त केले आहे.
जाहीरनाम्यानुसार “ग्लोबल ब्रेन ड्रेन” ही संकल्पना केवळ प्रतिभावंत व्यक्तींचे स्थलांतर नसून मानवजातीच्या सामूहिक बुद्धिमत्तेचा युद्ध आणि शस्त्रीकरणासाठी होणारा वापर हे त्याचे मोठे संकट आहे. वैज्ञानिकांनी औषधांऐवजी शस्त्रे तयार करणे, अभियंत्यांनी विकासाऐवजी युद्धसामग्री तयार करणे आणि प्रचंड आर्थिक संसाधने शिक्षण-आरोग्याऐवजी युद्धासाठी खर्च होणे हे मानवजातीसाठी धोकादायक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजकांनी RECONSCIO Governance या नव्या शासनतत्त्वज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले आहे. या तत्त्वज्ञानानुसार शासनाचे निर्णय तीन मूलभूत निकषांवर आधारित असावेत — मानवी प्रतिष्ठा, वैज्ञानिक पुरावा आणि निसर्गासह सर्व सजीवांचे सार्वजनिक कल्याण.
आयोजकांनी संयुक्त राष्ट्र संघ तसेच जगातील प्रमुख राष्ट्रांना युद्धबंदी, संवाद आणि विवेकाधारित निर्णयप्रक्रियेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनीही विवेकाधारित, नैतिक आणि जीवनसंरक्षक शासनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनात पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यामध्ये अशोक सब्बन, प्रकाश थोरात, यमनाजी म्हस्के, ॲड. अमित थोरात, ॲड. भास्करराव वडावकर, पोपट गोर्डे, सुधीर भद्रे, सरपंच कैलास पठारे, सरपंच सखाराम सरक, विरबहादूर प्रजापती, अनिल घाटविसावे, अशोक भोसले, पोपट भोसले, संदीप पवार, यमनाजी मस्के आदींचा सहभाग असणार आहे.
मानवतेचे भविष्य युद्धात नसून विवेक, ज्ञान आणि शांततेत आहे, हा संदेश देण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात येत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

