
महाराष्ट्र राज्य समाचार/अहिल्यानगर :- समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि सामाजिक विषमता यासोबतच पर्यावरणाचा ऱ्हास,पाणीटंचाई आणि हवामान बदल या गंभीर समस्यांवर उपाय म्हणून “जनलोक ब्रेन गेन-रेन गेन” ही एकात्मिक लोकचळवळ उभी राहू शकते,असा विश्वास पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष जेष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केला.
त्यांच्या मते आजच्या काळात केवळ आर्थिक विकास पुरेसा नाही. समाजातील अनेक समस्या या विचारसरणी आणि चुकीच्या माहितीमुळे निर्माण होतात. त्यामुळे समाजात ज्ञानाधारित जागरूकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आवश्यक आहे. ब्रेन गेन : ज्ञान आणि चेतनेची क्रांती ब्रेन गेन या संकल्पनेचा अर्थ समाजात विवेक, वैज्ञानिक विचार आणि सजग नागरिकत्व वाढवणे असा आहे. समाजातील अनेक समस्या जैविक नसून समाजात पसरलेल्या चुकीच्या कल्पना, परंपरा आणि विचारसरणीमुळे टिकून राहतात. जातिव्यवस्था हे त्याचे स्पष्ट उदाहरण असल्याचे गवळी यांनी सांगितले.त्यांनी असेही सांगितले की, शिक्षण आणि सामाजिक जागृतीच्या माध्यमातून या समस्यांवर उपाय शक्य आहे. यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षण आणि समतेचा मार्ग आजही मार्गदर्शक आहे.
रेन गेन : पर्यावरण संरक्षणाची चळवळ रेन गेन या संकल्पनेत पावसाच्या पाण्याचे संवर्धन, भूजल पुनर्भरण, वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणावर भर देण्यात येतो. पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, जलस्रोत जपणे आणि वृक्षसंवर्धन करणे यामुळे पर्यावरणीय संतुलन राखले जाऊ शकते. याचा थेट परिणाम शेती, अन्नसुरक्षा आणि मानवी आरोग्यावर होतो.
जनलोक संडे ओपन स्कूल : लोकजागृतीचे केंद्र ही चळवळ प्रभावीपणे राबवण्यासाठी “जनलोक संडे ओपन स्कूल” ही संकल्पना महत्त्वाची असल्याचे गवळी यांनी सांगितले. प्रत्येक गावात किंवा परिसरात आठवड्यातून एक दिवस नागरिकांनी एकत्र येऊन ज्ञान, संविधान, सामाजिक समता,वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण संरक्षण यावर चर्चा करावी, असे त्यांनी सुचवले.
जनलोक अदालत या मधून संवादातून वाद निराकरण याच बरोबर “जनलोक अदालत” या संकल्पनेतून स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तज्ज्ञ यांच्या सहभागातून सामाजिक व वैयक्तिक वाद संवादाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे न्यायालयांवरील ताण कमी होऊन समाजात बंधुता आणि समन्वय वाढण्यास मदत होईल.
ज्ञान आणि पर्यावरणाचा समन्वय ब्रेन गेन आणि रेन गेन या दोन्ही संकल्पना परस्परपूरक असून त्यातून ज्ञानाधारित, समताधिष्ठित आणि पर्यावरणपूरक समाज निर्माण होऊ शकतो,असेही ॲड. गवळी यांनी स्पष्ट केले.
जर प्रत्येक गावात आणि शहरात “जनलोक संडे ओपन स्कूल” उभे राहिले, तर भारतात ज्ञानक्रांती, सामाजिक न्याय आणि पर्यावरणीय संतुलनाच्या नव्या युगाचा प्रारंभ होऊ शकतो, असा विश्वासही ॲड. गवळी यांनी व्यक्त केला.
