पीपल्स हेल्पलाईनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या विचारांचा जागर!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन!
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करुन त्यांचे तत्व अंगीकारण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी प्रकाश थोरात, मिलिंद आंग्रे, अनिल घाटविसावे, अण्णासाहेब गायकवाड, वसंत पारधे, भाऊसाहेब ठोंबे, संजय ढाणे, संभाजी भिंगारदिवे, सुनील आहेर, दीपक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकाश थोरात म्हणाले की, जेव्हा महू येथे रामजी सुभेदारांच्या घरी बाबासाहेब जन्माला आले, तेव्हा त्यांच्या अस्तित्वाची माहिती शेजारच्या काही लोकांनाच होती. परंतु त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या वेळी संपूर्ण जगाने त्यांच्या जाण्याने अश्रू ढाळले. कोट्यवधी दलित समाज पोरका झाल्याची भावना देशभर उमटली. हे त्यांच्या आयुष्याच्या आणि कार्याच्या महानतेचे सर्वात मोठे उदाहरण आहे.”
थोरात पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रशास्त्र ते धम्मशास्त्र असे दोन अनमोल ग्रंथ देशाला दिले. भारतीय राज्यघटनेद्वारे स्त्री, दलित, शोषित आणि वंचित घटकांना संरक्षण देऊन समता प्रस्थापित केली. तर बौद्ध धम्माच्या शिकवणीद्वारे धर्म नाकारलेल्या समाजाला आत्मउन्नतीचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचाराने स्वतःचा आणि समाजाचा खरा उद्धार घडू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

