(प्रकाश थोरात -राजकीय विश्लेषक महाराष्ट्र विशेष )
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण घडवणारी ऐतिहासिक घडामोड समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) एकत्र येण्याची शक्यता चर्चेत असून, दोन्ही बंधूंचा एकत्रित प्रयत्न ‘राजा’ म्हणजेच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात, राजकीय व्यवस्थेत आणि सत्तेच्या समीकरणांमध्ये मोठा परि- णाम होऊ शकतो. याचा संभाव्य राजकीय परिणाम म्हणजे मराठी मतांचे एकत्री करण असेल, शिवसेना व मनसे या दोन्ही पक्षांचा प्रमुख आधार मराठी मतदारवर्ग आहे. विभाजित मतांमुळे गेल्या दशकात दोन्ही पक्षांना नुकसान झाले. मात्र एकत्र आल्यास मराठी अस्मिता पुन्हा केंद्रस्थानी येऊन भाजप व काँग्रेससारख्या पक्षांना मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक पातळीवर बदल घडून येऊ शकतो. ही केवळ दोन पक्षांची युती नाही, तर ती मराठी अस्मितेच्या पुनरुज्जीवनाची सुरुवात ठरू शकते.
उद्धव राज एकत्र आल्यामुळे मुंबई महापालिकेवर परिणाम होईल, मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेचा काही वारसाहक्क आहेच, पण शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला देखील आहे. जर ही दोन्ही शक्ती एकत्र आल्या, तर आगामी निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजपला जबरदस्त टक्कर मिळू शकते. अनेक दशकापासून ठाकरे कुटुंबाची एकत्र प्रतिमा पाहण्याची तमाम मराठी बांधवांना इच्छा आहे. राजकीयदृष्ट्या ही केवळ पक्षांची नव्हे तर कुटुंबाचीही पुनर्रचना ठरेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा एकत्रित वारसा जनतेसमोर येईल आणि शिवसेना-मनसे युतीला भावनिक पाठबळ देखील मिळू शकते.
