— ॲड. कारभारी गवळी यांची संकल्पना चर्चेत
अहिल्यानगर प्रतिनिधी/- २१व्या शतकातील भारतीय लोकशाहीसमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पीपल्स हेल्पलाइन चे प्रमुख ॲड. कारभारी गवळी यांनी मांडलेली “मायक्रो-कॉन्शिओ विद्रोह” ही संकल्पना वेगाने चर्चेचा विषय ठरत आहे. ही पारंपरिक अध्यात्मिक किंवा राजकीय चळवळ नसून, नागरिक जाणीवेची आणि लोकशाही सक्रियतेची आधुनिक क्रांती मानली जात आहे.
ॲड.गवळी यांच्या मते, ही चळवळ अंतर्मुख शांततेपेक्षा बाह्यमुख संघर्षशीलतेचा मार्ग स्वीकारते. धर्मग्रंथांऐवजी भारतीय संविधानालाच सर्वोच्च ग्रंथ मानत, प्रत्येक नागरिकाने स्वतःला “लघु-संविधान (Micro-Constitution)” मानावे, अशी या आंदोलनाची मध्यवर्ती भूमिका आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये केवळ समाजाकडून अपेक्षित न राहता, प्रत्येक व्यक्तीने आपल्या आचरणात उतरवणे हेच या चळवळीचे उद्दिष्ट आहे.
या चळवळीतून नागरिकांना भीती, भ्रष्टाचार, निष्क्रियता आणि मानसिक गुलामगिरीविरुद्ध आंतरमनातील उठाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “विज्ञान + जाणीव + संविधान = नवभारताचा नागरिक-धर्म” हे अभिनव समीकरण मांडत ॲड.गवळी यांनी नवीन पिढीसमोर आधुनिक राष्ट्रीय कर्तव्याची व्याख्या ठेवली आहे.
ॲड.गवळी यांच्या मते, हे भारताचे “दुसरे स्वातंत्र्यलढे” असून, यावेळी शत्रू बाह्य नसून — नागरिकांची भीती, उदासीनता आणि ‘मला काय फरक पडतो’ ही मानसिकता आहे. नागरिकांनी जागृत, सजग आणि संघर्षशील होणे हेच लोकशाहीच्या संरक्षणाचे खरे शस्त्र असल्याचा त्यांनी दावा केला असून याकरिता पीपल्स हेल्पलाईनचे कार्यकर्ते अशोक सब्बन, सरपंच कैलास पठारे,सरपंच सखाराम सरक, प्रकाश थोरात, वीर बहादुर प्रजापती, भगवानराव जगताप, संदीप पवार, शाहीर कान्हू सुंबे, यमुना जी म्हस्के शेतकरी संघटना, ॲड.अमित थोरात, ॲड.भास्कररा वडावकर, विठ्ठल सुरम,पोपट भोसले, मीरा सरोदे, अग्रेसर आहेत.
आजच्या बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत, लोकशाहीला सर्वात मोठा धोका बाहेरून नसून आतून — नागरिकांच्या निष्क्रियतेतून निर्माण होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर “मायक्रो-कॉन्शिओ विद्रोह” ही संकल्पना समाजाला नवी ऊर्जा देणारी आणि नागरिक चेतना पुनर्संचित करणारी ठरू शकते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

