अहिल्यानगर, दि. — वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर संतुलित आणि विविध आहारावर आधारित “फूडिसिन पूल” ही संकल्पना जनतेच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते, अशी माहिती पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष तथा जेष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी दिली. ते म्हणाले की, आजच्या काळात मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि कुपोषण यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राने अनेक उपचारपद्धती विकसित केल्या असल्या तरी रोग निर्माण झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ न देणे हा अधिक प्रभावी मार्ग आहे.
“फूडिसिन” हा शब्द फूड (अन्न) आणि मेडिसिन (औषध) या दोन शब्दांपासून तयार झाला असून योग्य, संतुलित आणि विविध प्रकारचे अन्न हेच शरीरासाठी औषधासारखे कार्य करू शकते, असे त्यांनी सांगितले.
मानवी शरीराच्या योग्य कार्यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, तंतुमय पदार्थ आणि इतर सूक्ष्म पोषक घटक आवश्यक असतात. हे सर्व घटक एका अन्नपदार्थातून मिळत नाहीत. त्यामुळे आठवडाभरात विविध प्रकारच्या भाज्या, फळे, धान्ये आणि कडधान्ये यांचा समावेश असलेला अन्नसाठा म्हणजेच “फूडिसिन पूल” तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हिरव्या पालेभाज्यांमधून लोह आणि कॅल्शियम, फळांमधून अँटिऑक्सिडंट्स, कडधान्यांमधून प्रथिने आणि धान्यांमधून ऊर्जा मिळते. हे सर्व घटक शरीराला संतुलित प्रमाणात मिळाल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजार टाळण्यास मदत होते, असेही ॲड. गवळी यांनी सांगितले.
ही संकल्पना अत्यंत सोपी असून ती कोणत्याही महागड्या औषधांवर अवलंबून नाही. गावात किंवा शहरात—जर लोकांनी आपल्या दैनंदिन आहारात विविध नैसर्गिक अन्नपदार्थांचा समावेश केला तर आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
“उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला” या तत्त्वानुसार योग्य आणि विविध आहार हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असून प्रत्येकाने आपल्या आहारात भाज्या, फळे आणि नैसर्गिक अन्नपदार्थांचा समावेश करून फूडिसिन पूल तयार करावा, असे आवाहनही ॲड. कारभारी गवळी यांनी केले.
