अंधश्रद्धा म्हणजे वैज्ञानिक आधार नसलेल्या परंपरेने टिकून राहिलेल्या कल्पना -ॲड. कारभारी गवळी
अहिल्यानगर :- मानवी समाजातील अंधश्रद्धा, जातव्यवस्था आणि सामाजिक भेदभाव या गोष्टी मानवी DNA मध्ये नसून त्या समाजाच्या मानसिक आणि सांस्कृतिक माहितीच्या स्वरूपात साठलेल्या असतात, असे मत पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले. अंधश्रद्धा आणि जातव्यवस्था या मानवी आनुवंशिक रचनेचा भाग नसून त्या “Non-Genetic Information” म्हणजेच सामाजिक व मानसिक माहितीचे परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ॲड. गवळी म्हणाले की, आधुनिक विज्ञानानुसार मानवामध्ये दोन प्रकारच्या माहिती असतात — आनुवंशिक (Genetic) आणि अआनुवंशिक (Non-Genetic). आनुवंशिक माहिती DNA मध्ये साठवलेली असते आणि ती शरीराच्या रचना, वाढ आणि जैविक गुणधर्मांशी संबंधित असते. परंतु समाजातील परंपरा, श्रद्धा, भीती, जातव्यवस्था, धार्मिक रूढी आणि सामाजिक नियम या गोष्टी DNA मध्ये नसतात. त्या मानवी मेंदूत शिक्षण, संस्कार, परंपरा आणि सामाजिक दबाव यांच्या माध्यमातून साठलेल्या असतात.
त्यांच्या मते, अंधश्रद्धा म्हणजे वैज्ञानिक आधार नसलेल्या पण परंपरेने टिकून राहिलेल्या श्रद्धा. करणी-उतारा, काळी जादू, ग्रहदोष, अपशकुन यांसारख्या कल्पना पिढ्यान् पिढ्या भीती आणि अज्ञानामुळे समाजात टिकून राहिल्या आहेत. त्याचप्रमाणे जातव्यवस्था देखील जैविक वास्तव नसून सामाजिक रचना आहे. मानवाच्या DNA मध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र असे कोणतेही जैविक वर्ग अस्तित्वात नसल्याचे विज्ञान स्पष्ट करते. त्यामुळे जन्मावर आधारित श्रेष्ठ-कनिष्ठतेची संकल्पना ही मानवनिर्मित सामाजिक माहिती आहे.
ॲड. गवळी पुढे म्हणाले की, अंधश्रद्धा आणि जातव्यवस्था या दोन्हींचे मूळ मानवी मेंदूत साठलेल्या दीर्घकालीन सामाजिक माहितीमध्ये आहे. ही माहिती परंपरा, धार्मिक शिकवण, सामाजिक दबाव आणि संस्कार यांच्या माध्यमातून इतकी दृढ होते की लोक तिला नैसर्गिक सत्य समजू लागतात. मात्र प्रत्यक्षात ती समाजाने निर्माण केलेली मानसिक रचना असते.
इतिहासात अनेक उदाहरणे आहेत की समाजातील चुकीच्या परंपरा ज्ञान आणि जागृतीमुळे बदलल्या. सती प्रथा, गुलामगिरी, अस्पृश्यता आणि स्त्री शिक्षणावरील बंदी या गोष्टी एकेकाळी स्वाभाविक मानल्या जात होत्या; परंतु शिक्षण, विज्ञान आणि सामाजिक चळवळींमुळे त्या नष्ट झाल्या.
ॲड. गवळी यांनी सांगितले की, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकाधिष्ठित विचारसरणी रुजवणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांच्या विचारप्रणालीत तर्क, विज्ञान आणि मानवतावादी मूल्ये रुजली तर जुन्या अवैज्ञानिक माहितीची जागा नवीन ज्ञान घेऊ शकते. समाजाने स्वतःच्या विचारव्यवस्थेचे पुनर्रचन केल्यास अधिक समतावादी, वैज्ञानिक आणि प्रगत समाज निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे अंधश्रद्धा आणि जातव्यवस्था या अपरिवर्तनीय नाहीत. योग्य शिक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सामाजिक न्यायाच्या आधारावर त्या बदलणे शक्य असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

